महाराष्ट्रात आजपासून गतिशील कारभार सुरू
– मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
नागपूर, दि. १५ (शिबिर कार्यालय) – राज्य मंत्रिमंडळाचा आज विस्तार करण्यात आला असून यामध्ये एकूण 39 मंत्र्यांनी शपथ घेतलेली आहे. महाराष्ट्रात आजपासून गतिशील कारभार सुरू झाला आहे. हिवाळी अधिवेशनात विरोधी पक्षाने विविध संसदीय आयुधांचा वापर करून उपस्थित केलेल्या सर्व प्रश्नांवर चर्चा करून राज्याच्या व जनतेच्या हितासाठी निर्णय घेण्यात येतील, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे सांगितले. हिवाळी अधिवेशनात एकूण 20 विधेयके मांडण्यात येणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
नागपूर हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला रामगिरी या शासकीय निवासस्थानी आयोजित मंत्रिपरिषद बैठकीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पत्रकार परिषद झाली. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन आदी उपस्थित होते.
मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, हिवाळी अधिवेशन आहे आणि थंडी देखील आहे. त्यामुळे या अधिवेशनामध्ये आम्ही महाराष्ट्राच्या जनतेला ऊब मिळेल आणि ऊर्जा मिळेल, अशा प्रकारचा कारभार करण्याचा प्रयत्न निश्चितपणे करू. महाराष्ट्रामध्ये सामान्य माणसाला आणि विशेषतः विदर्भात अधिवेशन चालू असल्यामुळे विदर्भाच्या जनतेला देखील दिलासा देण्याचा प्रयत्न करण्यात येईल. या अधिवेशनामध्ये राज्यपालांच्या अभिभाषणावर चर्चा, पुरवणी मागण्यांवर चर्चा, सत्तारूढ पक्ष व विरोधी पक्षाच्या प्रस्तावावर चर्चा असे कामकाज होणार असून त्यासोबत जवळपास वीस विधयेके मांडण्यात येणार आहेत.