कोपरगांव शहरालगत टाकळी चौफुली पासून पूर्व दिशेला काही अंतरावर बुधवार दि. ५ नोव्हेंबर २०२५ रोजी सायंकाळी बिबट्याच्या हल्ल्यात उसतोडणी कामगाराच्या लहान मुलीचा मृत्यू झाला. या गंभीर घटनेचे पडसाद जनसामान्यात सर्वत्र उमटले.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेवून उपवनसंरक्षक धर्मवीर सोलविठ्ठल (भा.व.से.) यांनी घटनास्थळी धाव घेतली. पीडित कुटुंबाला तातडीची मदत देण्याची कार्यवाही लवकरच पूर्ण करू असे आश्वासन दिल्याची माहिती पर्यावरण प्रेमी सुशांत घोडके यांनी दिली.
सुशांत घोडके यांनी सोलविठ्ठल यांच्याशी केलेल्या चर्चेतून अहिल्यानगर जिल्ह्यात सुमारे एक हजार पेक्षा जास्त बिबट असून कोपरगांव तालुक्यात सुमारे ४५ ते ६० चे पुढे संख्या आहे. काही वर्षापूर्वी वनक्षेत्रात आढळणारा बिबट हा शहरी वस्तीत दिसू लागला आहे. त्याची दोन मुख्य कारणे म्हणजे मोठ्या प्रमाणावर झालेली जंगलतोड आणि बिबटच्या खाद्याचे घटलेले प्रमाण कारणीभूत आहे. तसेच बिबट मादी ही दर दोन वर्षात प्रजनन होवून दोन ते चार पिल्लांना जन्म देते. त्यामुळे बिबट संख्या झपाट्याने वाढत आहे. गोदावरी नदी काठच्या कोपरगांव तालुक्यातील उस, मका यासह उभ्या पिकात बिबट रहिवास करतो आहे. तेथे जन्मलेल्या पिल्लांना लहानपणी उसाचे शेत हेच आपले निवारा ठिकाण वाटू लागते. त्यामुळे ते भविष्यातही तेथे किंवा परिसरात रमतात. त्यांची पुढची पिढी तेथे तयार होत आहे. शेळी, कुत्रा, डुक्कर यासह बिबट त्याच्या पेक्षा कमी उंचीच्या प्राण्याची शिकार करतो. रात्रीच्या वेळी शिकार करणारा निशाचर प्राणी म्हणून त्याला ओळखतात. त्याला शिकार मिळाली नाही तर मानवी वस्तीत लहान मुलांवर हल्ला करु शकतो. त्यात निष्पाप लहान मुलांचा बळी जातो आहे. अशा प्रसंगी जनक्षोभ उसळणे स्वाभाविक आहे.
नुकतेच जुन्नर, पुणे यासह कोपरगांव तालुक्यात शिंगणापूर येथील मोलमजुरी करणा-या दांपत्याचा काही दिवसांपूर्वी लहान मुलाला बिबट्याने उचलेले होते. तेव्हा त्या मुलाच्या आईने मोठ्या धाडसाने बिबट्याची शेपटी पकडून मुलाचे प्राण वाचवले. आठ दिवस जिल्हा रुग्णालयात उपचार घेवून तो मुलगा दोन दिवसांपूर्वी सुखरुप घर आला होता. तसेच काही दिवसांपूर्वी एका महिलेवर हल्ला झाल्याची घटना आहे. काल तीन वर्षीय मुलीचा बिबट्याने हल्लाने झालेला अंत पाहून माणूस म्हणून हृदय पिळवटून जाते.
अशा घटनेनंतर काही दिवस वन विभाग सक्रिय झाल्याचे दिसते पण जणप्रक्षोभ शांत झाला की पुनः पहिले पाढे .. असेच काहीसे शासकीय धोरण आहे. आता जिल्ह्यात बिबट्यांची एव्हढी मोठी संख्या असल्याच उघड होत आहे. तसेच बिबट्याच्या हल्ल्यात जीव गामावल्यानंतर शासन दहा पंधरा लाख रुपये पीडित कुटुंबाला देण्यास तयार आहे. अशा वेळी बिबट्यांच्या खाद्याचे नियोजन करणे त्यासाठी जागा आरक्षित करणे हा उपाय असू शकतो.पण या दृष्टीने सरकारी यंत्रणा कुठलेच पर्याय शोधत नसल्याचे दिसून येते.
कालच्या घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या लहान मुलीच्या पालकांना दहा लक्ष रुपये तत्काळ खात्यात आणि उर्वरित पंधरा लक्ष मदत लवकर होणार असल्याचे वनविभागाने सांगितले आहे. तसेच शिंगणापूर येथील बिबट हल्ल्यात जखमी मुलाचा उपचार खर्च वन विभागाने केला आहे.
चिमूरडीच्या मृत्यू नंतर परिसरात संताप व्यक्त केला जात आहे. दोन्ही घटनेत कोपरगावचे माजी लोकप्रतिनिधी कोल्हे परिवाराने पीडित कुटुंबाची भेट घेऊन सांत्वना दिली आहे. तसेच विवेक कोल्हे यांनी वन अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरल्याचे दिसून आले.
